शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

नारायण मूर्ती शून्यातून

वर्ष 1978 – 

नारायण मुर्ती तेव्हा पटनी कॉम्पुटरमध्ये नोकरी करत होते, कंपनीच्या काही कामानिमीत्त ते ऑनसाईट म्हणजे पॅरीसला गेले होते.

जाताना ते विमानाने गेले होते, काही महिन्यांनी त्यांचे काम पूर्ण झाले, नारायण मुर्ती यांच्या मनात साम्यवाद आणि डाव्या चळवळीविषयी आकर्षण होते, तेव्हा वापस येताना त्यांनी विमानाने न येता, एकामागे एक देशांना भेटी देत येण्याचा मार्ग निवडला.

त्यांना मिळालेली संपत्ती त्यांनी तेथील गरजुंना दान केली, आणि सोबत प्रवासापुरते फक्त चारशेपन्नास डॉलर्स ठेवले.

ह्या प्रवासात ते साम्यवादी देशांना भेटी देऊ शकणार होते, आपल्या देशात आणि डाव्या देशांमध्ये असलेला फरक ते अनुभवणार होते.

विवीध लोकांशी संवाद साधणार होते.

पॅरीसमधुन बाहेर पडून अनेक देशांमधुन प्रवास करुन ते बल्गेरीयात पोहचले, तेव्हा एक आक्रित घडले.

एका ट्रेनच्या प्रवासात, ते सोबतच्या एका सहप्रवाशी स्त्रीला देश आणि तिथल्या कार्यपद्धतीबद्द्ल विचारपुस करु लागले. दुर्दैवाने ती स्त्री मुलुखाची संशयी होती. तिला वाटले, की नारायण मुर्ती गुप्तहेर आहेत, जे आपल्या देशाविषयी माहिती जमा करत आहेत.

तिने गस्तीवर असलेल्या पोलिसांना हा माणुस संशयास्पद असल्याची तक्रार केली.

नारायण मुर्तींना त्या अज्ञात प्रदेशात अटक झाली. त्यांचं काहीएक ऐकुन घेतलं गेलं नाही,

त्यांच्याजवळचं सगळं सामान जप्त केलं गेलं.

त्यांना एका आठ बाय आठ च्या खोलीत डांबुन ठेवलं गेलं. 

तब्बल बाहत्तर तास!

जेवायलाही दिलं गेलं नाही.

त्या खोलीला खिडकी नव्हती, ना टॉयलेटची व्यवस्था होती.

नारायण मुर्ती प्रचंड घाबरले होते, कोणीही त्यांचं ऐकुन घेत नव्हते. आता जगु की वाचु, इथुन बाहेर कसे पडु, काहीच समजत नव्हते,

तीन दिवसांनी पोलीसांनी त्यांना बाहेर काढले, अत्यंत अपमानास्पद वागणुक देत, त्यांना बल्गेरीयाच्या बाहेर हाकलण्यात आले,

त्यांचे कपडे, सामान, पैसे दिलेच नाहीत, वर सुनावले,

“भारत बल्गेरीयाचा मित्र आहे म्हणुन तुम्हाला जिवंत सोडत आहोत.”

नारायण मुर्ती त्यांच्या आत्मचरित्रात म्हणतात, ते बाहत्तर तास आठवले की आजही अंगाचा थरकाप होतो.

त्या जीवघेण्या घटनेनंतर, कित्येक महिने मुर्ती खोलवर डिप्रेशनमध्ये गेले होते.

ह्या घटनेने त्यांच्या जीवनावर खुप परीणाम केला.

असला दहशतवादी डावा साम्यवाद त्यांना अजिबात रुचला नाही,

त्यांनी मनोमन ठरवले, “मी एक कंपनी उभा करीन, प्रचंड मोठी कंपनी, “

“त्या कंपनीत माझ्या देशातल्या लाखो, करोडो लोकांना रोजगार मिळेल.”

“सॉफ्टवेअर क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी कंपनी उभा करीन, त्यासाठी माझं सर्वस्व देईन.“

आपल्या करीअरमधला सर्वात मोठा जुगार खेळुन त्यांनी पटनी कॉम्पुटरमधला जॉब सुरक्षित आणि चांगल्या पगाराचा जॉब सोडला.

गाठिशी फार पैसे नसताना नवा डाव मांडला.

१९८१ मध्ये सुरु झालेली कंपनी हेलकावे खात सुरु होती. पहील्या दहा वर्षात काही खास झाले नव्हते.

लायसन्स राज मध्ये सरकारी बाबुंचा उद्योजकांना प्रचंड त्रास होता.

१९९० मध्ये कंपनीतल्या बाकीच्या सात पार्टनर्सनी इन्फोसीसला विक्री करुन ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग सुचवला.

मुर्ती प्रचंड अवस्थ झाले.

जणु नारायण मुर्तींच्या डोळ्यासमोरच त्यांच्या अपत्याचा गळा घोटला जात होता. 

कंपनी विकण्याच्या प्रस्तावाला त्यांनी प्रखर विरोध केला.

“फक्त थोडे दिवस थांबा, मला काळोखामध्ये आशेचा किरण दिसत आहे.”

हा आशेचा किरण काय होता त्यांनाही माहित नव्हते, पण त्यांची तळमळ प्रार्थना सच्ची होती.

१९९१ मध्ये तो आशेचा किरण उजडला, जागतिकीकरण झाले, भारत मुक्त अर्थव्यवस्था झाला.

लायसन्स राज संपला.

पुढच्या दहा वर्षात इन्फोसीसने इतिहास घडवला. 

इन्फोसीसचा ९२ रुपयांचा शेअर आठ वर्षात दहा हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने विकला गेला, तो चक्क १४६ पटींने वाढला.

हा विक्रम आजपर्यंत कुणालाही मोडता आला नाही.

२००० साली इन्फोसीसने २००० करोड रुपये निव्वळ नफा कमवला होता.

२०१० मध्ये तो चौदा हजार करोड रुपये होता.

आजकाल तो पंचवीस हजार करोड असतो.

दोन लाख कर्मचारी, जगभरातल्या सर्व प्रमुख शहरांमध्ये अलिशान ऑफीसेस!

पगारासोबत कंपनीचे शेअर्स देऊन, इन्फोसीसने ड्रायव्हर आणि कॅंटीनवाल्यापासुन प्रत्येक कर्मचार्‍याला करोडपती बनवलं. 

फक्त एका माणसामुळे हे शक्य झालं, 

एन आर नारायण मुर्ती!

त्यांनी बघितलेल्या एका स्वप्नामुळे हा प्रवास शक्य झाला.

बुल्गेरीयात झालेल्या त्या अपमानाने त्यांना विलक्षण शक्ती दिली. 

गांधीजींना धक्के मारुन बाहेर काढण्याशी मिळताजुळता हा प्रसंग, मुर्ती पेटुन उठले.

म्हणुन की काय जगाने त्यांना नवं नाव दिलं, “कॉर्पोरेट गांधी!”

मुर्तींनीही हे नाव सार्थ केले.

अरबपती म्हणण्याइतके श्रीमंत झाल्यावरही उतले नाहीत, मातले नाहीत.

दोन हातांनी गरीबांना भरभरुन देत राहीले.

कंपनी आर्थिक समृद्धीच्या उच्चशिखरावर असताना गेली तीस वर्ष मुर्ती दांपत्य, आपल्या बेंगलोरच्या जयनगरच्या फ्लॅट्मध्ये साधेपणाने राहीले.

वीरपन्नने अपहरणाची धमकी देऊनही, सरकारकडुन सुरक्षा नाकारली.

कित्येक वर्ष त्यांनी आणि त्यांच्या पत्नी सुधा यांनी घर-कामाला नौकरही ठेवला नाहीत.

विमानात नेहमी इकॉनॉमी क्लासनेच प्रवास केला. 

मित्रांनो, एका डिप्रेशननेच मुर्तींना ही असाधारण व्यक्तिमत्व बनवले.

आपल्या आयुष्यात जर डिप्रेशन-फीप्रेशनसारखे प्रकार आले असतील तर आपणही पेटुन उठुया.

भव्य स्वप्ने मनःपटला वर मांडुया,

दिवसातुन चौदा-सोळा तास प्रामाणिकपणे झोकुन देऊन, आपलं काम करुया.

जगाला रोज एका नव्या मुर्तीची गरज आहे.

हे ही आर्ट ऑफ लिव्हिंगच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा