मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर*

*-संजय सोनवणी*

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता *महाराजा यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...*

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.

यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. *६ जानेवारी १७९९ रोजी राज्याभिषेक करून घेऊन सावभौमतेची द्वाही फिरवली. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.**

दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. त्यांचे बंधू दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर *पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.*
.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

*यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले.* मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मैल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..


खरे तर इंग्रजी सैन्य हे खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सैन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. *उज्जैन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे.* 

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे *त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता.* त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..*‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे.* माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात. *यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गव्हर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.*

कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. दुर्दैवाने २८ ऑक्टोबर १८११ रोजी ऐन तारुण्यातच वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी  त्यांचे निधन झाले. असा महान  पहिला  स्वातंत्र्ययोद्धा  आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. त्यांना पुण्यस्मरण  दिनानिमित्त विनम्र अभिवादन!


*संजय सोनवणी*
9860991205

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा